शैक्षणिक क्रांतीचे जनक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज
(२६ जून १८७४– ६ मे १९२२)
महाराष्ट्रातील
करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक
शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण
इ. सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या
दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या
अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व
धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू
त्यांना मिळाले. विद्यार्थि दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत,
इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास
केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या
गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१).
त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन
कन्या झाल्या.
त्यांनी
प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन
समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८
साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर
मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणा निमित्त त्यांनी युरोपचा दौरा
केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यामुळे त्यांचे
अनुभवविश्व समृद्ध झाले.
कोल्हापुरात
वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे
क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार
नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो.
टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा
अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने
हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी
शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला,
पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच
राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा
पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त
प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या
जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट
होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म.
फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे
अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा
पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे
पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी
कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री
शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र
‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून
त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व
सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी
आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व
जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या
तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले
नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे
चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन
समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान
व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी
शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर
दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा
कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली.
प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील
मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून
शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत,
मुस्लीम, सुतार, नाभिक,
महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे
स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर,
नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे
सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार
झाल्या.
मागासलेल्या
जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी
नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील
५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव
जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे
उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा,
पाणवठे, विहिरी, दवाखाने,
कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने
प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना
सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या.
त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन
खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त
जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले.
खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना
समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध
करणार कायदा जारी केला (१९२०).
याच
सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९).
बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील
उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत
बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव
केला.
अस्पृश्यतेबरोबरच
जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण
उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली
(१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह
घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास
व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक
छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९).
मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.
सामाजिक
सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व
औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी,
रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी,
जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही
गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा
पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून
आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात
संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून
त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची
मुहूर्तमेढ रोवली (१९१३).
शाहूंनी
संगीत, नाट्य, चित्रकला,
मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या
क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं,
भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने
अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना
आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला
दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर
(केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय
केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला.
बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे
प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील
मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे
मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची
पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध
होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर
त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या
सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या
कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून
त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत
करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी
यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच
मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या
अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
अशा
थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन !
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विषयक निवडक लेख, प्रबंध,
ग्रंथ व माहिती ..
१.
|
शैक्षणिक क्रांतीचे
जनक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज
लोकराज्य मासिक सप्टेंबर २०१८
|
Click
here
|
२.
|
समाजसुधारक राजर्षी छत्रपती
शाहू महाराज
|
Click here
|
३.
|
राजर्षी शाहू महाराज आणि आर्य समाज
|
Click
here
|
४.
|
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ब्राह्मणेत्तर चलवळ (इ.स. १८७४
-१९२२) पी एच डी शोधप्रबंध
|
Click here
|
५.
|
Shahu Chhatrapati of Kolhapur: A social
revolutionary 1874-1922 PhD Thesis
|
Click here
|
६.
|
The study of educational thoughts and
work of Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur PhD Thesis
|
Click here
|
७.
|
CONTRIBUTION OF CHHATRAPATI SHAHU JI MAHARAJ IN THE FIELD
OF EDUCATION IN THE MODERN TIMES
|
Click
here
|
८.
|
श्री छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र लेखक – आ.बा. लठ्ठे
|
Click
here
|
९.
|
क्रांतीसुक्ते
छत्रपती शाहू ग्रंथ ,
संपादक – एस.एस.
भोसले
|
Click
here
|