Welcome to the Jeevandeep Library Knowledge Hub. Be sure to let us know in the contact box in you have any suggestions.

Saturday, May 28, 2022

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ...

 प्रतिकूलता ही अशी शक्ती आहे

जी माणसाच्या खर्‍या मूल्यांचे मूल्यांकन करते

आणि त्याला आयुष्यात पुढे नेते.

-स्वातंत्र्यवीर सावरकर

 

शक्ति आणि बुद्धि हे दोन्ही गुण एकत्र एका व्यक्तिमध्ये फार क्वचितच आढळून येतात. स्वा. विनायक दामोदर सावरकर ही अशी एक व्यक्ती होवून गेली, जिच्या व्यक्तिमत्वात हे दोन्ही गुण ठायी ठायी दिसून येतात.  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे, इ.स. १८८३ मध्ये जन्मगाव भगूर(जिल्हा नाशिक ) येथे झाला . हे थोर क्रांतिकारक,मराठी भाषेचे कवी व लेखक होते. हिंदुत्वाचे संघटक तसेच आग्रही ,भाषाशुद्धी तसेच लिपीशुद्धीचे प्रणेते. प्रखर विज्ञानवादी संस्कृत प्रचुर, साहित्यिक, कवी, नाटककार, लेखक, जातीभेदाचे तीव्र विरोधक स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाचे राजकारणी व हिंदुसंघटक होते. सावरकर लहानपणापासून बुद्धिमान होते,आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ त्यांनी घेतली.

वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते मात्र ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही. सतत त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. १९४८ ला महात्मा गांधीवध झाला आणि नेहरु शासनाने सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही. थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.

पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला. या थोर क्रांतीकारकाने लहान वयापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक क्रांतिकारक म्हणून महान कार्य केले, अश्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला आपण सतत स्मरणात ठेवायला पाहिजे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे-

Literature on Swatantryaveer Savarkar

Click here

SWATANTRYAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR

by Loksabha Secretariat ,New Delhi

Click here

अंदमानच्या अंधेरीतून,लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Click here

आत्मचरित्र माझ्या आठवणी , लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Click here

हिंदूराष्ट्र दर्शन,

लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Click here

E-books & Documents on Swantantraveer Savarkar (Marathi, Hindi, English)

Click here

The Life of Barrister Savarkar by Chitragupta

Click here

Essentials of Hindutva by Swantantraveer Savarkar

Click here

List of Books on/by Swatantryaveer VinayakDamodar Savarkar

Click here

 

Monday, May 16, 2022

तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्ताने...

तथागत गौतम बुद्धांना (Gautam Buddha) ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या प्रवचनातून त्यांनी अखंड समाजाला उद्धाराकडे नेण्याचा मार्ग आपल्या पाच जुन्या सहकाऱ्यांना सांगितला. हे प्रवचन देताना बुद्ध असे सांगतात, की माणूस आणि त्याचे जगातील नाते हा या बुद्ध धम्माचा (Buddha Dhamma) उद्देश आहे. कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेवून त्याचा सर्वांगीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु, भारतासारख्या देशांमध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती- व्यक्तीमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते.

बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशामध्ये मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन करताना सांगितले, की मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्य्रात राहात आहे. याचाच अर्थ दुःख आणि दारिद्य्र ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत. बुद्धांच्या या वाक्‍याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) सखोल अभ्यास करून या उपदेशाची समकालीन समाज व्यवस्थेशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. "बुद्ध की कार्ल मार्क्‍स' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुःख या शब्दाच्या माध्यमातून समाजात अस्तित्वात असलेल्या पिळवणुकीचा संदर्भ दिलेला आहे. त्यांच्या मते, समाजातील व्यक्तीमध्ये आसक्ती (हाव) हा पिळवणुकीचा मूळ पाया आहे. कोणत्याही गोष्टीविषयी असणारी लालच समाजातील एका वर्गाला मालकी हक्क देते, तर दुसऱ्या वर्गाला शोषणयुक्त जीवन पद्धती जगण्यासाठी भाग पाडते. यावरून आपणास असे लक्षात येते, की कोणत्याही संसाधनाची मालकी किंवा समाज व्यवस्थेवर असणारी मालकी ही एक प्रकारची आसक्ती असून त्यामुळे समाजामध्ये भेदभाव आणि विषमता निर्माण होते.

बुद्धांच्या मते खासगी मालकी समाजातील एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख (शोषण) देते. बुद्ध फक्त समाजातील या विषमतेविषयीचे विश्‍लेषण करून थांबले नाहीत. तर त्यांनी ती विषमता नष्ट करण्यासाठी सदाचाराचा मार्ग सांगितला. हा सदाचाराचा मार्ग समाजातील अन्याय दूर करून समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यास मदत होईल, असे त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी मैत्री व प्रज्ञा या दोन गोष्टींवर भर दिलेला आहे. मैत्रीच्या माध्यमातून समाजामध्ये बंधुभाव निर्माण होण्यास मदत होईल. कारण, मैत्रीमध्ये कोणीही उच्च किंवा कनिष्ठ नसतो. सर्वांना समान अधिकार, समान संधी व समान स्थान प्राप्त होतात. तर समाजातील अज्ञान (अविद्या) नष्ट करून जोपर्यंत व्यक्ती सुज्ञ होत नाही तोपर्यंत तो नेहमी दुःखात जगत राहील. याचाच अर्थ, जोपर्यंत व्यक्ती आपल्या पिळवणुकीविषयी जागरूक होत नाही, तोपर्यंत समाजामध्ये विषमता कायम टिकून राहील. म्हणून बुद्धांनी आपल्या त्रिसरणामध्ये सर्वांत महत्त्वाचे स्थान हे प्रज्ञेला दिले आहे.

प्रज्ञा म्हणजे सम्यक ज्ञान. या सम्यक ज्ञानाच्या माध्यमातून समाजात वावरत असताना चांगल्या-वाईट चूक- बरोबर न्याय- अन्याय, कुशल- अकुशल इत्यादी कृतींमध्ये फरक करून त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे म्हणजेच बुद्धांच्या मते प्रज्ञा होय. बुद्धांच्या मते "ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. त्याच प्रमाणे प्रज्ञेचीही व्यक्तीला आवश्‍यकता असते.' शिक्षण हे फक्त अर्थार्जन करण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दुःखाचा अंत करणारे एक क्रांतिकारी शस्त्र आहे, हे युवकांमध्ये रूढ होण्याची गरज आहे. एक धर्म म्हणून नव्हे तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून बुद्धांच्या विचारसरणीच्या आधारे आपले आचरण करण्याची नितांत गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या मूल्यांची व विचारसरणीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समज करून आजच्या तरुण पिढीने सम्यक मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये स्व- जाणीव व स्वावलंबी बनवून एक आदर्शवादी व ध्येयवादी जीवन जगण्यासाठी सर्वसमावेशक विचारधारेची आवश्‍यकता आहे. बुद्धांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी समर्पक असल्याचे दिसून येते.




Friday, May 6, 2022

शैक्षणिक क्रांतीचे जनक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त...

शैक्षणिक क्रांतीचे जनक: राजर्षी  छत्रपती शाहू महाराज 

 (२६ जून १८७४६ मे १९२२)

महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थि दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.

त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणा निमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.

मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).

याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.

अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. 

अशा थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन !

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांचे विषयक निवडक लेख, प्रबंध, ग्रंथ व माहिती ..

१.       

शैक्षणिक क्रांतीचे जनक: राजर्षी  छत्रपती शाहू महाराज

लोकराज्य मासिक सप्टेंबर २०१८

Click here

२.      

समाजसुधारक राजर्षी  छत्रपती शाहू महाराज

Click here

३.       

राजर्षी  शाहू महाराज आणि आर्य समाज

Click here

४.      

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ब्राह्मणेत्तर चलवळ (इ.स. १८७४ -१९२२) पी एच डी शोधप्रबंध

Click here

५.      

Shahu Chhatrapati of Kolhapur: A social revolutionary 1874-1922 PhD Thesis

Click here

६.      

The study of educational thoughts and work of Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur PhD Thesis

Click here

७.     

CONTRIBUTION OF CHHATRAPATI SHAHU JI MAHARAJ IN THE FIELD OF EDUCATION IN THE MODERN TIMES

Click here

८.      

श्री छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र लेखक – आ.बा. लठ्ठे

Click here

९.       

क्रांतीसुक्ते छत्रपती शाहू ग्रंथ ,

संपादक – एस.एस. भोसले

Click here

 


 

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्टीय ग्रंथपाल दिन

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आज स्मृतिदि...